नागरिकत्व सुधारणा विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
महाईन्यूज | मुंबई
सोमवारी रात्री लोकसभेत मंजूर झालेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. दरम्यान, काल या विधेयकाला शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही अशी सरळ विभागणी केली गेलेली आहे. त्यामुळे कुणाला शंका घेण्यास वाव मिळू नये म्हणून आम्ही लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. या विधेयकात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. तसेच याबाबत जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत मतदान करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले.
लोकसभेत मांडल्या गेलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामध्ये पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे या विधेयकाबाबत अधिक माहिती घेतली पाहिजे. जोपर्यंत या विधेयकाबाबत स्पष्टता निर्माण होत नाही तोपर्यंत आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या आणि विरोध करणाऱ्या लोकांने हे विधेयक खरोखरच कळले आहे का, हा पण प्रश्नच निर्माण झाला आहे. बाहेरून येणारे नागरिक कुठे राहणार, त्यांची जबाबदारी कोण घेणार, हे निश्चित झाले पाहिजे. मात्र शिवसेना कुठल्याही गोष्टीसा आंधळेपणाने विरोध करणार नाही, तसेच कुणाला बरं वाटावं आणि कुणाला वाईट वाटावं म्हणून शिवसेना भूमिका घेत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.