नवविवाहित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवणारा पती अटकेत
नवविवाहित पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पेटवून देणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत विवाहितेचा गंभीररित्या भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी पती नव्या विवाहाची नवलाई सोडून पत्नीकडे सातत्याने हुंड्याची मागणीही करीत असल्याची बाब समोर आली आहे. पवई परिसरात ही घटना घडली आहे. कोर्टाने आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आठ महिन्यापूर्वीच पीडितेचा आणि आरोपीचा विवाह झाला होता. दोघेही उत्तर प्रदेश येथील मुळचे रहिवासी आहेत. विवाहानंतर नवदाम्पत्य तुंगा गावातील खोलीत राहण्यासाठी आले. मात्र, विवाहाच्या नवलाईचा आनंद घेण्याऐवजी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे लग्नानंतर केवळ आठच महिन्यांत त्यांचा संसाराचा डोलारा विस्कटला.
संशयाच्या भुताने झपाटलेला पती पत्नीचा शाररिक आणि मानसिक छळ करायचा, घटनेच्या दिवशी एकीकडे नव्या वर्षाचा जल्लोष सुरु होता. वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात पती आणि पत्नी दोघेच होते. यावेळी त्याने रागाच्या भरात पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यानंतर ही आग विझविण्याचा प्रयत्नही त्याने केला, यात तो ही भाजला गेला. विवाहितेला पेटलेले पाहताच स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात पीडिता ९० टक्के भाजल्याने तिला कपूर आणि नंतर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
पीडिता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना पवई पोलीसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन तिचा जबाब नोंदविला. सुरुवातीला पीडितेने आपल्या जबाबात यात पतीचा दोष नसल्याचे सांगत स्टोव्हच्या भडक्यामुळे आपण पेटलो गेल्याचे सांगितले. मात्र, पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपी पतीवर गंभीर आरोप केले. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी पीडित विवाहितेचा जबाब नोंदवला त्यात तिने पती आपल्याकडे बाईकसाठी पैशाचा तगादा होता तसेच आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन शाररिक आणि मानसिक छळ करायचा असा जबाब दिला. यावरुन पोलिसांनी संबंधीत आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले.