नववर्ष स्वागताआधीच ४४ तळीराम चालकांवर कारवाई
मुंबई : दारूच्या नशेत नववर्षांचे स्वागत करताना स्वत:सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी सुरू केली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत नाकाबंदीत ४४ तळीराम चालक सापडले.
पोलिसांनी ३० डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी लावून तपासणी सुरू केली. गुरुवारी ती आणखी तीव्र केली. या कारवाईत तरुण दुचाकीस्वरांची कसून झडती घेण्यात आली. जेथे नाकाबंदी नव्हती त्ेाथेही तरुण दुचारीस्वरांना थांबवून त्यांची झडती घेण्यात येत होती. वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत एकूण १२०५ चालकांची तपासणी करण्यात आली. त्यात ४४ चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे आढळले.
किनारे फुलले
संध्याकाळनंतर गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगाव चौपाटीसह सर्व किनारे नववर्षांच्या स्वागतासाठी आलेल्या गर्दीने फुलले होते. गुन्हा घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.
फटाक्यांची आतषबाजी
नववर्षांचे स्वागत करताना रात्री ११.५५ ते १२.३० या वेळेतच फटाक्यांची आतषबाजी करावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र गुरुवारी संध्याकाळनंतर ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी बिनदिक्कत सुरू होती.
बलिकेचा विनयभंग करणारा अटकेत
मुंबई : इमारतीच्या उद्वाहनात आठ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी सिल्वासा येथून अटक केली. जायचंद यादव उर्फ वकील(४०) असे त्याचे नाव आहे. त्याने नोव्हेंबरमध्ये हा गुन्हा केला होता. उद्वाहनात बालिका एकटी असल्याचे पाहून त्याने अश्लिल चाळे केले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन आलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली केदारी पवार आणि त्यांच्या पथकाने सिल्वासा येथे दडून बसलेल्या यादवला अटक केली. तो सराईत गुन्हेगार आहे.