नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका – शिवसेना
मुंबई: रामजन्मभूमीच्या संघर्षात जे जीवावर उदार होऊन लढले व खटले अंगावर घेतले त्यांची काँग्रेस राजवटीत फरफट झाली. ते सर्व लोक हिंदुत्ववादी म्हणून दहशतवादी ठरवले जाऊ नयेत, अशी अपेक्षा शिवसेनेचे मुखपत्र सामानाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली.
पानसरे, दाभोलकरांचे प्राण घेणारे कोणीही असोत, त्यांना कठोर शासन व्हायलाच हवे. फक्त नगास नग उभे करून हिंदूंना दहशतवादी ठरवू नका इतकेच. कारण उद्या देशावर संकट येईल तेव्हा हिंदूंची सर्व मने आणि मनगटे अशा कारवायांमुळे आधीच विझून गेलेली असतील. अशे सामानातून स्पष्ट करण्यात आले.
काँग्रेस राजवटीत ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाने चांगलीच खळबळ माजवली होती. तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांनी हिंदू दहशतवादाची बांग दिल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने त्यावेळी संसदेत आणि रस्त्यावर थैमान घातले होते. आज काँग्रेसचे राज्य नाही. महाराष्ट्रात व दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे राज्य असूनही ‘हिंदू दहशतवाद’ असल्याचे ढोल बडवले जात आहेत व त्याबाबत सरकारने खुलासा करणे गरजेचे आहे.