नगर जिल्ह्यातील पोपटराव पवार, राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री, जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/popat-pawar.jpg)
अहमदनगर | महाईन्यूज
हिवरे बाजारचे सरपंच आणि आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना आणि अकोले तालुक्यातील बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. नगर जिल्ह्यातील दोन व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचे काम संपूर्ण देशभरात झळकले आहे. त्यांनी गावात व्यसनमुक्तीची मुहूर्तमेढ रोवली. ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर त्यांना गावातील लोकांनी सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल केला. कमी पाण्यावर येणा-या पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. शेजारील डोंगरावर वृक्षलागवड केली. तसेच जागोजागी पाणलोटाची कामे केली. त्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा संचय झाला. त्यातून गाव खऱ्या अर्थाने हिरवे झाले. गावाचे उत्पन्न वाढले. तरूणांच्या हाताला गावातच काम मिळाले.
तर, अकोले तालुक्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे कार्य अनमोल आहे. त्यांनी देशी बियाण्यांची बॅंक केली आहे. त्यातूनच त्यांना मदर ऑफ सीड असे सन्मानाने म्हटले जाते. संकरित वाणांचा सुळसुळाट झाला असतानाही त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळे दुर्मिळ देशीवाणांचे जतन होत आहे. आदिवासी भागात राहून त्यांनी देशी वाणांचे जतन केले, तसेच त्याचा प्रसार व प्रचार केला.