धक्कादायक! धरणातून सोडलेल्या पाण्यात सासू-सून वाहून गेल्या, जळगावातील वाघूर धरण क्षेत्रात थरार
जळगाव: वाघूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यात आज (30 जुलै) सकाळी सासू-सून वाहून गेल्या आहेत. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील साकेगाव येथे घडली आहे. वाहून गेलेल्या दोन्ही सासू-सूनेचा ग्रामस्थांकडून शोध घेतला जात आहे. सिंधुबाई अशोक भोळे (वय अंदाजे 65) आणि योगिता राजेंद्र भोळे (वय सुमारे 35) अशी वाहून गेलेल्या सासू-सूनेची नावं आहेत. वाघूर नदीच्या पात्रात सध्या तुलनेत कमी पाणी आहे. काही दिवसांपूर्वी नदी पात्र दुथडी भरून वाहत असले तरी सध्या पाऊस नसल्याने पात्रात कमी पाणी आहे. या पार्श्वभूमिवर साकेगाव येथील सिंधुबाई आणि योगिता या दोघी महिला आज सकाळी नदी पात्रात गेल्या होत्या आणि ही घटना घडलेली आहे.
त्या दोघी काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्यावरील बाजूस गेल्या होत्या. या दोघी दररोज या भागात जाऊन वाळू गाळण्याचे काम करत होत्या. यानुसार आजही दोघीजणी सकाळी वाळू गाळण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी धरणातून पाणी सोडल्यामुळे अचानक नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढू लागलेला होता. यामुळे त्या घाबरून उंच ठिकाणी असणार्या भागावर जाऊन मदतीसाठी धावा करू लागल्या. पण पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या वाहून गेल्या आहेत. यावेळी पुलावर असणार्या काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी यात त्यांना यश आलेले नाही. अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेल्या आहेत. ही माहिती गावात मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या दोन्ही महिलांचा शोध घेण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे.