breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास

दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या १८० तालुक्यांतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांसाठी एसटीचा मोफत पास देण्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी केली.

राज्य शासनाने गेल्याच आठवडय़ात १८० तालुक्यांतील सुमारे १८-१९ हजार गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यानुसार या गावांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळानेही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एसटीच्या मासिक पाससाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते. मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक वर्षांसाठी ही प्रवास सवलत १०० टक्के देण्यात येईल. त्यामुळे एसटी महामंडळावर सुमारे ८५ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. राज्यातील सुमारे ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळेल, असे रावते यांनी सांगितले.

पावसाअभावी शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील बहुतांश लोक एसटीने प्रवास करतात. एक प्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. त्यांना अडचणीच्या काळात मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून ही सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.   – दिवाकर रावते, परिवहनमंत्री

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button