दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश हत्येचा तपास एकाच छत्राखाली का नको? : सुप्रीम कोर्ट
दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) सुप्रीम कोर्टाने कलबुर्गी, गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरुन सवाल विचारला. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी, गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश या हत्या प्रकरणात समान धागा आहे का ?, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने सीबीआयला विचारला आहे.
एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ रोजी पहाटे दोन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून निर्घृण हत्या केली होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. कलबुर्गी यांनी हिंदू धर्मातील मूर्तिपूजेवर वेळोवेळी टीका केली होती. पोलिसांच्या संथ तपासावर नाराजी व्यक्त करत कलबुर्गी यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली.
सुप्रीम कोर्टाने दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला सवाल विचारला. गोविंद पानसरे, कलबुर्गी, दाभोलकर आणि गौरी लंकेश या चारही हत्यांमध्ये समान धागा आहे का?, असे कोर्टाने सीबीआयला विचारले. समान धागा असल्यास सीबीआयने उर्वरित तिन्ही प्रकरणांचा तपासही सुरु करावा, असे कोर्टाने सांगितले. या प्रकरणावर सीबीआयच्या वकिलांनी यावर लवकरच सविस्तर भूमिका मांडू असे सांगितले. आता या प्रकरणावर जानेवारीत सुनावणी होणार आहे.