दहावी, बारावीतील 700 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
![10th, 12th, 700 meritorious students,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Shrirang-Barane.jpg)
पिंपरी : थेरगावातील दत्तनागरी सहकारी पतसंस्था, शिव छत्रपती प्रतिष्ठान आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे यांच्या वतीने दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. तब्बल 700 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना शालेय बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.
चिंचवडे लॉन येथे झालेल्या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, अभिनेत्री साक्षी गांधी, मावळ लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वजित बारणे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटीका शौलाताई पाचपुते, महिला शहर संघटीका सरीता साने, तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक लहु नवले, दत्तनागरी पत संस्था उपसंचालक दिलीप बोंबले पाटील, हणुमंत माळी, धनाजी बारणे, बशिर सुतार, बाळासाहेब वाघमोडे, नंदु जाधव, संतोष बारणे व इतर शिवसेना, युवासेना पदाधिकारी, बँकेचे शिष्टमंडळ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी मेहनत करावी लागेल. जिद्द, चिकाटी आणि धेय्य डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा. केवळ पदवी घेण्यावर भर देवू नका, व्यावसायिक अभ्यासक्रम शिका, केंद्र, राज्य सरकारचे विविध कोर्स उपलब्ध आहेत. ते कोर्स शिकावेत. त्यातून तुम्ही नोकरी देणारे होताल. पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहर आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक शहरात रोजगारासाठी येतात. त्यामुळे पदवी घेवून नोकरी करण्यापेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकून व्यावसायिक व्हावे.
जगात वेगाने बदल घडत आहेत. पुढील दहा वर्षांचा काळ देशाचा आणि जगाचा चेहरा मोहरा बदलणारा असणार आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षात कोणत्या क्षेत्राला महत्व राहील याची माहिती आताच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने त्यांना करिअर निवडता येईल. आर्टीफिशयल इंनटीजिलीएंट, आरोग्य या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. पर्यावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे पुढच्या दहा वर्षाचे नियोजन करून क्षेत्र निवडावे. यशस्वी होउन शहराचे नाव करावे. आपला भारत देश हा युवकांचा देश आहे. महासत्ता होण्याच्या दिशेने येणारा काळ हा देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. तुम्ही विद्यार्थी देशाचे भवितव्य आहात. त्यामुळे आपल्या आवडत्या क्षेत्रात जावून शिक्षण घ्यावे. त्याच क्षेत्रात करिअर करावे. जेणेकरून तुम्हाला यशस्वी होण्यात कोणताही अडथळा येणार नाही. आवडीच्या क्षेत्रात आपण झपाटून आणि मन लावून काम करतो असे मार्गदर्शन विश्वजित बारणे यांनी केले.
कला क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार – साक्षी गांधी
अभिनेत्री साक्षी गांधी म्हणाल्या, आजच्या सोशल मीडियाच्या युगात पुस्तकी ज्ञान महत्वाचे आहे. तसेच युवा वर्गास पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार देखील तेवढेच महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी अभिनेत्री क्षेत्रातील येणा-या विविध समस्यांवर मात करून त्यांना नाव लौकिक मिळवले आहे. कला क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.