तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठवला गांजा
!['That' farmer's wife lodged a complaint with the police against the tehsildar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Maharashtra_Police_Seal.png)
बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते अॅड सुहास कांबळे यांनी उचलले पाऊल
सोलापूर |महाईन्यूज|
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात खुलेआम गांजा विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुहास कांबळे यांनी केला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी पोस्टाने कांबळे यांनी पाठवली आहे.
अॅड. सुहास कांबळे यांनी बार्शीत चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत वेळोवेळी पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या. मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने शहरातून गांजा खरेदी करुन सोबत तक्रारी अर्ज कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना पाठवल्याची माहिती सुहास कांबळे यांनी दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/download-6.jpg)
यासंदर्भात बोलताना सुहास कांबळे म्हणाले की, “बार्शी शहर आणि जिल्ह्यात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. मटका, दारु आणि गांजा विक्री ही खुलेआम चालते. याठिकाणातील तरुणांनी नेमका काय आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. तरुणांना व्यसनाधिकतेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी मी पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक यांना वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले आहेत. त्या सोबत उपोषण आणि आंदोलन देखील केले आहेत. मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना शहरातून विकत घेतलेली गांजाची पुडी आणि तक्रारी अर्ज पाठवला आहे. जर याही पत्राची दखल घेतली नाही तर मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे.”
दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, “बार्शी शहर आणि परिसरात गांजा विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी संबिधत लोकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. याही प्रकरणी संपूर्ण चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल”