जळगावात पपईने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात; १५ मजूर ठार, २ जखमी
जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने यावल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 10 सदस्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावलजवळ असलेल्या किनगाव येथे साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेकडे चालला होता. ट्रकमध्ये भरलेल्या पपयांवर मजूर बसले होते. ट्रक उलटल्यामुळे हे मजूर पपईच्या ढिगाऱ्याखाली सापडले असल्याचे कळते आहे. सर्व मजूर हे झोपलेले असल्याने काही कळण्याच्या आत काळाने त्यांच्यावर झडप घातली. या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघाताबाबत माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.