जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावं; अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी चंद्रकांत पाटलांचं आवाहन
मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत राज्य सरकार आणि पोलिसांना धारेवर धरले आहे. हे प्रकरण 2018चं प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी बोलताना या अटकेप्रकरणी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावं आणि आंदोलने करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच सोशल मीडियावरून आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे. 2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.’ त्याचबरोबर ‘आजच्या पिढीलादेखील इंदिरा गांधींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळीदेखील जनतेने सरकारला संविधानाच्याविरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आतादेखील थांबवत आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच ‘राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो असं या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही’, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.