जनता मोदी सरकारला विटली; बदलासाठी आतुर – शरद यादव
मुंबई – देशातील जनता मोदी सरकारला विटली असून केंद्रात बदल घडवण्यासाठी आतुर बनली आहे. अलीकडेच झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालाने ते दाखवून दिले आहे, असे लोकतांत्रिक जनता दलाचे (एलजेडी) मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी आज म्हटले.
राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची येथील एशियन हार्ट इन्सिट्यूटमध्ये भेट घेतल्यानंतर शरद यादव पत्रकारांशी बोलत होते. पोटनिवडणुकांचे निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा वाजवणारे आहेत. त्या पक्षाच्या विरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष समान कार्यक्रम निश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत.
विरोधकांच्या ऐक्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होण्याचा विश्वास वाटतो, असेही ते पुढे बोलताना म्हणाले. शरद यादव यांनी जेडीयू आणि त्या पक्षाचे प्रमुख नितीशकुमार यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एलजेडी या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. दरम्यान, हृदयविकारावर उपचार घेण्यासाठी लालूंना येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूूस करण्यासाठी शरद यादव यांनी रूग्णालयाला भेट दिली.