छत्रपतींच्या विचारांमुळेच रायगडावर शिवभक्तांची गर्दी : संभाजीराजे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/1-1-2.jpg)
रायगड – साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यावेळी महाराजांनी दिलेल्या व्यापक विचारांमुळेच आज त्यांच्या राज्याभिषेक दिनाला शिवभक्तांची लक्षणीय उपस्थिती आहे असे उद्गगार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काढले. छत्रपती शिवरायांच्या ३४३ व्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी ते रायगडावर बोलत होते.
रायगडाच्या राजदराबारामध्ये काल रात्रीपासूनच राज्याभिषेक सोहळ्याच्या विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली. आज मुख्य कार्यक्रम सकाळी राजदरबारात संपन्न झाला. या सोहळ्याला राज्याचे दुग्धविकासमंत्री महादेव जानकरयांच्यासह सरदार घराण्यातील मान्यवरही उपस्थित होते.
शिवराज्यभिषेक विधी पूर्ण झाल्यावर रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजराजे छत्रपती यांनी शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचारांचे महत्त्व विषद करताना या विचारांच्या व्याप्तीमुळे आज संपूर्ण जगभर छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती पसरल्याचे सांगितले. शिवाजी महाराजांमुळेच आज या राज्याभिषेक दिनाला संपूर्ण राज्यातून हजारो शिवभक्त उपस्थित राहिल्याचे सांगितले.
पुढील वर्षीच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी रायगडावर सुरू असलेल्या विविध विकास कामांपैकी फरसबंदी तसेच तटबंदी आणि विविध वाड्यांच्या उत्खननाची कामे पूर्ण होईल, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला. या तसेच इतर कामांसाठी केंद्रीय पुरातत्व खाते आणि राज्य शासनामध्ये सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.