चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत का?, राष्ट्रवादीने फटकारले
![Now ‘paint’ from cow dung; BJP boosts rural economy!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/chandrakant-dada-patil.jpg)
कोल्हापूर |महाईन्यूज|
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात कोणताही बदल होणार नाही, असे म्हणणारे भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करत ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र असल्याने शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
या बंदला महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगत राज्यातील जनतेने अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद पाळावा. तसेच, हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केला आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यात कोणताही बदल होणार नाही, असे सांगणारे चंद्रकांत पाटील हे देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करत ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. याचबरोबर, महाराष्ट्रात आंदोलनाला तीव्रता नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र, मुळात महाराष्ट्रात उसाला एफआरपी आहे, कापूस, तूर व इतर उत्पादनांना हमीभाव आहे आणि या संदर्भातील कायदे शरद पवार कृषिमंत्री असताना केलेले आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.