गौरीगणपतीच्या उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस राहव लागणार क्वारंटाइन?
गौरीगणपतीचा उत्सव हा सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यातला त्यात गौरीगणपतीचा उत्सव म्हटलं की लगबगीने तयारी लागतात ते कोकणवासी.आणि कोकणात जाणारे चाकरमानी. पण यंदा कोकणात धाव घेणाऱ्या चाकरमान्यांची वाट अवघड होण्याची चिन्हे दिसून येत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे हादरलेल्या सिंधुदुर्ग प्रशासनाने या उत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याची तयारी सुरू केली असून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. अर्थात याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारच्या पातळीवरच होणार आहे.
दरवर्षी कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये गौरीगणपतीसाठी मुंबईतून हजारो कुटुंबे जातात. कोकणामध्ये गौरीगणपतीचा सण मोठा असल्याने चाकरमानी कोठेही काम करीत असला, तरी या काळात तो कोकणातील आपल्या मूळ गावी धाव घेतो. यंदा मात्र अशा चाकरमान्यांनी या उत्सवासाठी यायचं झालं, तर किमान १४ दिवस अगोदर येऊन आपल्या घरी विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून घ्यावा, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या तयारीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे इतिवृत्त सध्या समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये प्रशासनाने चाकरमान्यांनी ७ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येऊन गणेश चतुर्थीपूर्वी १४ दिवस घरी विलगीकरणात रहावे, अशी सूचना करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनीही या बाबत खुलासा करताना, हे इतिवृत्त म्हणजे आदेश नव्हेत, असे स्पष्ट केले आहे. या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले, तरीही प्रशासनाची तयारी व मानस नक्की काय आहे, हेच या इतिवृत्तातून स्पष्ट होते आहे.