गणेशोत्सवातच ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का…
- राज ठाकरे : बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा
मुंबई – प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना आडकाठी का केली जाते, असा सवाल करत गणेश मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त गणेशोत्सव साजरा करावा. मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिकेने हायकोर्टाच्या आदेशानंतर गणेश मंडळांना मंडपासाठी अटी टाकल्या आहेत. दक्षिण मुंबई, गिरगाव या भागातील गणेश मंडळांना मंडपासाठी परवानगी दिली जात नसल्याची तक्रार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी बुधवारी गिरगावला भेट दिली.
गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा. गेली 60 ते 70 वर्षे गिरगावात गणेशोत्सव साजरा होत आहे. मात्र आत्ताच याबाबत तक्रार आली, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गणेशोत्सव वर्षातून एकदा दहा दिवस असतो. त्यासाठी का आडकाठी केली जाते, असा प्रश्न विचारत राज ठाकरे म्हणाले, मशिदीवरचे रोजचे भोंगे बंद करत नाहीत, मग वर्षातून एकदा येणाऱ्या गणेशोत्सवाच्याच बाबतीत ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा का आठवतो.
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन राज यांनी गणेशोत्सव मंडळांना केले.