‘गडकरी म्हणतात, मोदी घरी बोलवून अपमान करतात’
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुजरेगिरी करतात असा आरोप माजी खासदार तथा किसान खेत मजदूर कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी (ता. आठ) केला आहे. म्हणून पक्षात अनेकजण दुःखी आहेत, त्यामुळे पक्षात लवकरच फूट पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी, त्यांनी जीएसटीच्या मुद्यांवर केंद्रिय मंत्री गडकरी सोबत असतानाचा किस्सा सांगितले आहे की, जीएसटीच्या मुद्यावर मोदींनी मत मांडण्यास सांगितले तेव्हा मी विरोधात भूमिका घेतली. माझे म्हणणे ऐकताच “मला शिकवायला आले का?’ असा प्रश्न करत पंतप्रधान मोदी भडकले. त्यानंतर बैठकच गुंडाळण्यात आली. नेत्यांची माझ्याजवळ येण्याची कोणी हिंमत दाखविली नाही, त्यावेळी फक्त नितीन गडकरी एवढेच बोलले की, “इथे घरी बोलावून आपला अपमान केला जातो’.
दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी मोदींवर टीका करताना “मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. भाजपात अडीच वर्षे बोलण्याची संधीच मिळाली नाही, मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम होते, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अशी विचारणा केली होती, मात्र आता त्यांनी राज्यच गायब करून टाकले आहे. फडणवीस सर्वांत वाईट मुख्यमंत्री आहेत, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.