खवळलेल्या समुद्रात नौका बुडाली ; खलाशी बचावले!
राजापूर : खवळलेल्या समुद्रातील अजस्त्र लाटा आणि सोसाटय़ाचा वाऱ्याचा तडाखा अशा प्रतिकूल स्थितीमध्ये तळाची फळी निखळून पाणी घुसल्याने तालुक्यातील तुळसुंदे येथील महालक्ष्मी बोटीला आजसकाळी ७ वा. च्या सुमारास जलसमाधी मिळाली. किनाऱ्यापासून सुमारे बारा वाव आत असलेल्या या घटनेमध्ये श्रीकृपा बोटीचे खलाशी योगेश सुर्वे यांच्या प्रसंगावधानामुळे जलसमाधी मिळालेल्या महालक्ष्मी बोटीवरील सात खलाशी बचावले. दरम्यान गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये वेत्ये परिसरामध्ये बोट बुडण्याची दुसरी घटना घडल्याने मच्छीमार बांधवांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण पसरले आहे.
तुळसुदे येथील नितीन देवकर आपल्या मालकीची महालक्ष्मी बोट घेऊन समुद्रामध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे मासेमारीला निघाले होते. यावेळी त्यांच्यासमवेत तुळसुंदे येथील कुंदन गणपत आडीवरेकर, भिकाजी रामचंद्र आडीवरेकर, जगदीश शांताराम शिरगावकर, पुरुषोत्तम म्हादू नाटेकर, राम हिराजी खडपे, संजय हरी पावसकर हेही त्या बोटीमध्ये होते. सोसाटय़ाचा वारा आणि मोठमोठय़ा लाटांचा सामना करीत निघालेली बोट किनाऱ्यापासून सुमारे बारा वाव आतमध्ये गेल्यानंतर बोटीच्या तळाची फळी निखळली. अन त्यातून बोटीमध्ये पाणी येत असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले. त्यामध्ये हळूहळू बोट पाण्यामध्ये बुडत असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. यावेळी बुडणाऱ्या स्थितीमध्ये जीवरक्षक साधने होती. मात्र, त्यांचा वापर करण्याचे त्या खलाशांना भितीमुळे भानच राहिले नाही. अशा स्थितीमध्ये बोटीवरील एका खलाशाने तुळसुंदे येथील एका ग्रामस्थाशी मोबाइलद्वारे संपर्क साधून मदत मागितली. त्या ग्रामस्थाने तातडीने समुद्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या श्रीकृपा बोटीवरील खलाशी सुर्वे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून या प्रसंगाची माहिती दिली.
प्रसंगावधान राखत श्री सुर्वे यांनी तातडीने आपली बोट महालक्ष्मीच्या मदतीसाठी वळविली. काही मिनिटांच्या कालावधीमध्ये बुडणाऱ्या महालक्ष्मीला गाठले. अन रस्सीच्या सहाय्याने महालक्ष्मी बोटीवरील सर्व खलाशांना सुखरूपपणे बाहेर काढले. श्रीकृपामधून सुखरुपपणे किनाऱ्यावर पोहोचल्यावर महालक्ष्मीमध्ये सर्व खलाशांच्या चेहऱ्यावर भिती दिसत होती. दैव बलवत्तर म्हणून वाचलो. योगेश सुर्वे आपले देवदूतच ठरले आहेत. अशा शब्दां्त महालक्ष्मी बोटीवरील खलाशी कुंदर आडीवरेकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दरम्यान या साऱ्यामध्ये महालक्ष्मीला जलसमाधी मिळाली.