खंडाळा घाटातील काचरदरीत भाजप शिवसेना सरकारला कायमची मूठमाती द्या-रमेश साळवे
सावंतवाडी महागांव- (महाईन्यूज)- राममंदीर, शेतकरी कर्जमाफी हे प्रश्न सुटले तरच युती करण्याचा विचार करेन अन्यथा युती गेली खड्यात म्हणणारे शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुजरातला गेले. मोदी-शहा आणि ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षात खोटी आश्वासने देऊन लोकांना फसविले आहे. त्यातच मागील पाच वर्षात शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळात एकही विकासकाम केले नाही. त्यामुळे आता या सरकारला खंडाळा खाटातील काचरदरीत कायमची मूठमाती द्या असा घणाघात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांनी केले.
मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी महागांव येथे आयोजित सभेत साळवे बोलत होते. यावेळीमावळ तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्षश्री.गणेशआप्पा ढोरे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपकभाऊ हुलावळे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेशभाऊ खांडगे, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन पंढरीनाथ ढोरे, नगरसेवक सुनिलभाऊ ढोरे, संत तुकाराम सहकारी कारखान्याचे संचालक अशोक शेडगे संचालक महादुमामा कालेकर जेष्ठ नेते नामदेव ठुले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसन कदम, तालुका ओबोसी सेलचे माजी अध्यक्ष माऊली आढाव, जेष्ठ नेते अशोकराव घारे, माजी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, पवन मावळ महिला अध्यक्षा जयश्री पवार, सरचिटणीस उत्तम घोटकुले माजी सरपंच माउली निम्बळे, बाळासाहेब नेवाळे, खंडू तिकोणे, सुनील डोळे, अतुल सातकर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
साळवे म्हणाले की, पनवेल, कर्जत, उरण, खोपोलीपासून ते लोणावळा, मावळ पिंपरी-चिंचवडपर्यंतच्या राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांना मावळ लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात सूचना केली होती. त्यामुळे पवार साहेबांनी पार्थ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पार्थ पवार यांना निवडून आणण्याची जबाबदारीदेखील आपल्यावरती सोपविली आहे. विरोधकांनी खोटं बोलण्याचा पाढा सुरु केला आहे. पार्थ पवार हे नवखे आहेत. त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही, अशी चुकीची विधाने विरोधकांकडून केली जात आहेत. परंतु, संसदेत लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी केवळ मराठी बोलता येऊन चालत नाही, तर हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असणे गरजेचे आहे, तेव्हाच नागरिकांचे प्रश्न संसदेत मांडले जाऊ शकतात. पार्थ पवार हे उच्चशिक्षित उमेदवार आहेत. दहावी पास असलेले बारणे यांच्यापेक्षा ते निश्चितच लोकांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास साळवे यांनी व्यक्त केला.