कोल्हापूरची पंचगंगा सर्वात दूषित
- रायचूर विद्यापीठाचा अहवाल : पाणी पिण्यासच नव्हे तर शेतीसही अयोग्य
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी पूर्णपणे प्रदूषित झाली असून तिच पाणी पिण्यासाठी योग्य नाहीच तर शेतीसाठी सुद्धा योग्य नसल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात पिकणारा भाजीपाला खाल्ल्यामुळे कॅंसरसारखे आजार उद्धभवणार असल्याचा उल्लेखही या प्राथमिक अहवालात नोंद करण्यात आला आहे.
स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी रायचूर विद्यापीठातील तज्ज्ञांच्यामार्फत शिरोळ तालुक्याचा अहवाल तयार केला आहे. या अहवालाबाबत रायचूर विद्यापीठाचे संशोधक डॉ. शंकर गौडा आणि डॉ. आशुतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना भाजीपाला पुरवणारे केंद्र म्हणून ओळखला जातो. मात्र हाच तालुका या भाजीपाल्यामार्फत रोगराई पसरवणारे आगार होतोय कि काय अशी भीती निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रायचूर विद्यापीठातील तज्ञाच्या सहकार्याने गेल्या दोन महिन्यांपासून शिरोळ तालुक्यातील पाणी, माती आणि भाजीपाला यांचे विविध ठिकाणचे नमुने घेऊन त्यांच्या प्रयोगशाळेत चाचणी केली असता हे पाणी पूर्णतः दूषित असून ते शेतीसाठी आणि पिण्यासाठी अयोग्य असल्याचा प्राथमिक अहवाल आज सादर करण्यात आला आहे. हा भाजीपाला खाल्ला तर कॅंसरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.