कॅन्टोमेन्टच्या पाणीप्रश्नासाठी सवड नाही?
पालकमंत्री लक्ष देत नसल्याने प्रश्न लटकलेलाच
पुणे – लष्कर परिसरातील नागरिकांना गेले काही वर्षे भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत अजूनही तोडगा निघत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका आणि कॅन्टोनमेंट बोर्ड यांच्यामधील समन्वयाच्या अभावामुळे परिसरात पाणी टंचाईची समस्या होत असतानाच, पालकमंत्री गिरीश बापट यांनाही कॅन्टोमेन्टच्या पाणीप्रश्नासाठी सवड नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच परिसरातील नागरिकांचा पाणीप्रश्न सध्यातरी सुटण्याची शक्यता दिसत नाही.
लष्कर परिसरात ब्रिटिशकालीन पाइपलाइन असून, त्या अतिशय जुन्या झाल्या आहेत. यातून अनेक ठिकाणी पाणीगळती होत असते. तसेच कमी दाबाने पाणी येत असल्याने परिसरातील नागरिक मोटार लावून पाण्याच्या उपसा करतात. यामुळे इतर भागातील नागरिकांना कमी पाणी मिळते. परिणामी, असमान पाणीवाटपामुळे नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे परिसरातील पाइपलाइन बदलून त्या नव्याने टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. तसेच महापालिकेतर्फे नव्याने टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमधून जोड “कनेक्शन’ घेत काही काळापुरता का होईना, परंतु या प्रश्नावर तातडीने उपाय करण्याची मागणी बोर्डाच्या लोक प्रतिनिधींकडून केली जात आहे. यामागणी संदर्भात कालवा समितीचे प्रमुख असणारे गिरीश बापट यांची भेट घेण्याचे प्रयत्न गेले अनेक दिवस लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मात्र विविध कामांमध्ये व्यस्त असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी भेटीकडे दुर्लक्ष केले आहे. तर दुसरीकडे पाणीपट्टी स्थगित आहे, काम सुरू आहे, अशा सबब देत महापालिका या प्रश्नापासून पळ काढत आहे.
परिस्थिती “जैसे थे’
याबाबत नगसेवक अतुल गायकवाड म्हणाले, “लष्कर परिसरात असलेल्या पाणी प्रश्नाबाबत बोर्डाच्या एक महिन्यापूर्वी झालेल्या विशेष सभेमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेण्याचेही लोकप्रतिनिधींनी मान्य केले होते. मात्र कामांमध्ये व्यस्त असल्याने पालकमंत्र्यांशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे सध्यातरी परिसरातील पाणी प्रश्नावर काही उपाय नसून हा प्रश्न “जैसे थे’ परिस्थितीत आहे.