काही जिल्ह्यात मुसळधार; तर काही जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता
महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा बरसत आहे. यात हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3 तासांत नागपूर , गोंदिया, गडचिरोली , भंडारा , वर्धा , यवतमाळ , अमरावती जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज सकाळपर्यंत राज्यात काही जिल्ह्यात निरभ्र वातावरण होते तर काही जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने महाराष्ट्रात चांगलाच जोर धरला. यामुळे मुंबईसह काही जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना असलेली पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली.
मुंबईत अनेक भागात ऑक्टोबर हिट जाणवत असून अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या हलक्या सरी बरसत आहे. 1 जूनला केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 3 जूनला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाने झोडपलं. त्यानंतर मान्सून आगमनाबाबत शंका निर्माण झाली होती. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार 11 जून रोजी महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे मान्सूनचं आगमन झालं.