काळ्या टोपीखाली मेंदू असतोच पण तो स्वत:ला सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवत नसतो – उध्दव ठाकरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/A-Gallery_1-2.jpg)
मुंबई – शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातल्या भाषणात भाजपवर जोरदार वार केले होते. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख हा भाजपला टार्गेट करणारा होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. ठाकरे यांनी संघाच्या काळ्या टोपीवरून भाजपवर कोरडे ओढले होते. त्याला उत्तर देतांना भाजपने मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. काळ्या टोपीखाली मेंदू असतोच पण तो स्वत:ला सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवत नसतो, हिंदुत्व सोडत नसतो अशी टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भातखळकर म्हणाले, आजचं उद्धव ठाकरे यांचं भाषण हे गोंधळलेलं आणि गडबडलेलं होतं. त्यात ना धड हिंदुत्व, ना विकास ना धड सेक्युलॅरिझम असं काहीही नव्हतं.
काँग्रेस नाराज होईल म्हणून सावरकरांविषयी दोन चार वाक्य काढण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचाही भाषणात उल्लेख नाही अशी टाकाही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले…
सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणाही त्यांनी भाजपला लगावला.
आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगणा राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे असंही ते म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर गोमुत्राच्या गुळण्या केल्या तो सगळ्या जगाने पाहिलं असंही ते म्हणाले.
मुंबई, शिवाजी पार्क सगळीकडे चरस गांजा पिकला अस चित्र काही निर्माण केले, आमच्या घरासमोर तुळशीवृंदावन असते. गांजाची शेती तुमच्याकडे असते. मुंबई महाराष्ट्र पोलिस दल अभिमान आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनाम केले जाते.