breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटी संपावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या : उद्धव ठाकरे

मुंबई : एसटी संपाच्या वेळी बडतर्फीची कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना केले आहे. एक हजार 10 कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी देऊन नोकरीवर रुजू करुन घ्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. युनियनबाजीतून तरुण कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि त्यातच त्यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. उदार मनाने त्यांना माफ करा आणि त्यांच्या चुका पोटात घाला, अशी मागणी बडतर्फीची कारवाई झालेल्या एक हजार दहा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी दिवाकर रावते यांच्यासोबत या प्रकरणी फोनवरुन चर्चा केली. मानवतेच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण हाताळण्याच्या सूचना उद्धव यांनी रावतेंना दिल्या. कर्मचाऱ्यांची चूक आहे, मात्र ते आपल्याच परिवारातील आहेत. त्यांना एक संधी द्यायला हवी, असेही उद्धव ठाकरे रावतेंना म्हणाल्याची माहिती आहे.

वेतनवाढीच्या मागणीसाठी आठ आणि नऊ जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला होता. या संपामुळे सरकारचे प्रचंड नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. संपावेळी हिंसाचार करण्यात नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या सर्व कर्मचाऱ्यांवर सरकारने बडतर्फीची कारवाई केली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.


Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button