उष्णतेच्या लाटेने पुन्हा नागरिक हैराण
पुणे – विदर्भातील काही भागांत पुढील 24 तासांमध्ये उष्णतेची लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 45.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यातही या उन्हाळ्यातील उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
राज्यात दिवसभरात नोंदलेल्या गेलेल्या प्रमुख 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदला गेला आहे. मध्य महाराष्ट्रातील 11 पैकी नऊ, मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील दहा शहरांचा त्यात समावेश आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, नांदेड, तर विदर्भातील अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे गेले काही दिवस सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.
अंदमानात कमी दाब क्षेत्र
दक्षिण अंदमान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारी (ता. 29) दक्षिण अंदमान बेटांजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे अंदमान निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून पश्चिम बंगाल, सिक्कीमसह ईशान्य भारतातील राज्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
काही शहरांतील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
चंद्रपूर – 45.6
मालेगाव – 44.8
ब्रह्मपुरी – 44.3
अकोला – 44.2
वर्धा – 44.2
वाशीम – 44.2
नागपूर – 44.1
नगर – 43.9
यवतमाळ – 43.5
जळगाव – 43.5
परभणी – 43.2
अमरावती – 42.6
गोंदिया – 42.2