उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, राज्यात पावसाची हजेरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Samudra-Mansoon.jpg)
यावर्षी राज्यभरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना पुराचा सामना करावा लागला. नद्या, तळे, धरणे ही तुडुंब भरली आहेत. यामुळे यंदा पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाच्या सरी बरसत आहेत. आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मान्सूनने पश्चिम राजस्थानामधून परतीचा प्रवास सुरू केला आहे. आता परतीचा मान्सून वेगाने पुढे सरकत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
लवकरच महाराष्ट्रामधूनही मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय आहे. यामुळे या भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ पट्ट्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळण्याची कोसळू शकतता. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.