आमदार जयदत्त श्रीरसागर यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी हातातून घड्याळ उतरवून शिवसेनेचे शिवबंधन बांधले. क्षीरसागार यांनी बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘एक्झिट पोलमुळे मी हा निर्णय घेतलेला नाही. माझा निर्णय खूप आधीच झाला होता. राज्यात युतीच्या उमेदवाराचं मी जाहीर समर्थन केलं. ज्या पक्षाच्या स्थापनेपासून मी त्यात आहे, जो मी ताकदीनं वाढवला. बीड जिल्ह्यात सहा-सहा आमदार दिले. असं असतानाही राष्ट्रवादीनं दिलेल्या वागणुकीमुळं माझी, माझ्या कार्यकर्त्यांची सातत्याने घुसमट होत गेली’ असे मनोगत क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. क्षीरसागर यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात हा दुसरा झटका आहे. माजी मंत्री सुरेश धस यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. क्षीरसागर तीन वर्षापासून गटबाजीमुळे पक्षाच्या कार्यक्रमांपासून लांब होते.
राष्ट्रवादीत अन्याय झाला. स्वाभिमानाला ठेच पोहोचली. पक्षातील नाराजीबद्दल शरद पवारांशी चर्चा झाली. तरी सुद्धा पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्ष सोडावा लागतोय, असे क्षीरसागर शिवसेना पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलताना म्हणाले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जयदत्त क्षीरसागर नाराज होते. पक्षात आपली घुसमट होत होती, असे सांगत क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांच्यावर टीकाही केली होती. याशिवाय, बीडमधील एका कार्यक्रमात क्षीरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी क्षीरसागर राष्ट्रवादीतून बाहेर पडणार हे निश्चित झाले होते. क्षीरसागर भाजपामध्ये की शिवसेनेत प्रवेश करणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे.