आदिवासी कुमारी मातेचा विवाह
- पुनर्वसनाच्या दिशेने पाऊल
यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील वणी, केळापूर आणि झरी जामणी तालुक्यात पंधरा वर्षांपासून भेडसावत असलेल्या आदिवासी समाजातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाच्या पाश्र्वभूमीवर मेटीखेडा आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या राघोपोड येथे एका गर्भवती आदिवासी कुमारिकेचा विवाह तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाशी लावून देण्यात आल्याने, अशा मुलींच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटण्याचा आशा पल्लवीत झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
आरोग्य केंद्रात ही तरुणी तपासणीला आली होती. ती सात महिन्यांची गर्भवती होती व तिच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले होते. तिची प्रकृती लक्षात घेऊन या भागातील काही समाज सेवकांनी या प्रकरणी लक्ष घालून तरुणीशी शारीरिक संबध ठेवणाऱ्या युवकाची भेट घेतली व त्याची समजूत घातली आणि त्याने सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुलीशी लग्न करण्याची तयारी दाखवली.
या दोघांचाही विवाह पार पडला. त्यांना संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्य़ात कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडवण्यासाठी दीनदयाल बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष विजय केंद्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां पांढरकवडय़ाच्या प्रा. लीला भेले, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्यासह अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत. परप्रांतीय कंत्राटदार आणि ट्रक चालकांच्या वासनेला बळी पडून आदिवासी मुलींवर मातृत्व लादले जाते. अशा ६८ कुमारी मातांना गेल्या दिवाळीत दीनदयाल संस्थेने साडीचोळी देऊन सन्मानित करीत स्वरोजगार मिळवून दिला होता. कुमारी मातांचे पुनर्वसन करण्यासाठी, प्रतिष्ठापूर्ण निरामय आरोग्यासह सक्षम आर्थिक जीवन जगता यावे, यासाठी एखाद्या आयोगाची स्थापना करावी अशी मागणी दीनदयालने केली आहे.
या पाश्र्वभूमीवर राघोपोड येथे गर्भवती कुमारिकेच्या विवाहाने त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग खुला झाल्याचे मत या परिसरात व्यक्त होत आहे.