आता आवाज न उठविल्यास इतिहास माफ करणार नाही – राहुल गांधी
मुंबई – विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दलित समाजातील दोन मुलांना नग्न करून अमानुष मारहाण केल्याच्या घटनेविरोधात संप्तत प्रतिक्रिया उमटत आहे. या संतापजनक घटनेसाठी राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसच्या मनुवादी विचारांना दोषी ठरवले आहे. याविरोधात आज आवाज उठवला नाही, तर इतिहास माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे. कॉंग्रेस अध्यक्षांनी ट्विटवर या घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर करत भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी ट्विट केले की, महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा एवढाच होता की, ते एका सवर्ण विहिरीत पोहत होते. आज माणुसकीही अखेरच्या काडीच्या आधारावर आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आरएसएस/भाजपच्या मनुवादी, तिरस्काराच्या विषारी राजकारणाविरोधात आम्ही आवाज उठवला नाही, तर इतिहास आम्हाला कधीच माफ करणार नाही,
दरम्यान, ही घटना रविवारी उघडकीस आली होती. या संदर्भात फिर्याद देण्यात आली आहे. मात्र आरोपीकडून फिर्याद माघारी घेण्यासाठी पीडित कुटुंबियांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे.दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला या गावात राहायच आहे, असे सांगत पीडितांच्या कुटुंबीयांनीही तक्रार नोंदवण्याबाबत टाळाटाळ केल्याचे समजते.
या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.आरोपींवर मारहाण करणे आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे यासाठी आयटी ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ऍट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
दुसऱ्याच विहिरीचा पंचनामा
या घटनेनंतर आता राजकीय पक्षाचे नेते वाकडी गावात दाखल होत आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही गावाला भेट देत पीडितांची विचारपूस केली. तसेच कॉंग्रेसच्या एका पथकाने गावाला भेट दिली.या पथकात अब्दुल सत्तार आणि राजू वाघमारे यांचा समावेश होता. या प्रकरणाबाबत मात्र पोलिसांनी दुसऱ्याच विहिरीचा पंचनामा केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आरोपींच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी पंचनाम्यात घटनेतील विहीरच बदलल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.