आठवडा पावसाचा! ; मुंबई पुन्हा जलमय; रायगडमध्ये तिघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने रविवारी सकाळी रुद्रावतार धारण केला आणि मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले. गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर कायम असून, रायगडमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. पुढील आठवडाभर मराठवाडय़ाचा अपवाद वगळता मुंबईसह राज्यभर पावसाच्या सरी सुरू राहणार आहेत.
मुंबईमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली. नळबाजार, नाना चौक, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, भायखळा, हिंदमाता, परळ, वांद्रे, मिलन सब-वे, शीव, चेंबूर, टिळकनगर, कुर्ला, घाटकोपरसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील अनेक परिसरात पाणी साचले. वडाळा, शीव, कुर्ला, विद्याविहार, ठाणे यासह काही ठिकाणी रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विलंबाने धावत होती. अनेक ठिकाणचे लहान-मोठे रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे रस्ते मार्गावरील वाहतूक कोलमडली. परिणामी, बेस्टच्या बसगाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेकडून मोठय़ा प्रमाणावर नदी-नाल्यांची साफसफाई करण्यात आल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला होता. मात्र, शनिवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने पालिकेचे नालेसफाईबाबतचे दावे फोल ठरवीत रस्ते जलमय केले. मात्र, सुट्टीचा दिवस असल्यामुळे त्याचा फारसा फटका मुंबईकरांना बसला नाही. परंतु काही भागात दीड-दोन फूट पाणी साचले आणि तळमजल्यावरील घरे जलमय झाली. तसेच झोपडपट्टय़ांमध्ये पाणी साचून रहिवाशांचे अतोनात हाल झाले.