आजपासून गोवर-रुबेला लसीकरण मोहीम
३.३८ कोटी बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत मंगळवार, २७ नोव्हेंबरपासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नऊ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ही लस सुरक्षित असून पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.
नऊ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी जरी देण्यात आली असेल तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस द्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. मंगळवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.
गोवर मुळे भारतात दरवर्षी ५० हजार जण मृत्यूमुखी पडतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी होते. रुबेला हा गर्भवती मातेला झाल्यास तिचा गर्भपात होऊ शकतो. बालकास मोतिबिंदू, हृदयविकार, मतिमंदत्व, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे इ. आजार होऊ शकतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. भावी पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे, असे सावंत यांनी सांगितले.
लसीकरणाचे नियोजन
- पहिल्या सत्रात पहिल्या दोन आठवडय़ांत सर्व शाळांमध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्य़संपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे.
- शेवटच्या दोन आठवडय़ांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.