आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना ३० टक्के पगार कपात
औरंगाबाद – वृद्धापकाळात आई-वडिलांची काळजी घेतली जात नाही, त्यांना वृद्धाश्रमात किंवा एकटं पाडलं जातं. आई-वडिलांची अशी अबाळ होऊ नये याकरता औरंगाबाद जिल्हा परिषदेने एक ठराव समंत केला आहे. त्यानुसार आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे काही अधिकारी आणि कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक देत नाही, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाने वृद्ध पालकांना दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांमध्ये हजारो कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. यातील अनेक जण आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती पगारातून 30 टक्के पगार कपात करुन आई-वडिलांच्या खात्यात वळती करण्याचा ठराव सभागृहात सर्वानुमते पारित झाला.
औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे काही कर्मचारी आणि अधिकारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. काही तक्रारी अत्यंत गंभीर स्वरुपाच्या असल्याचं समोर आलं होतं. त्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा 30 टक्के पगार कपात करण्याचा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने सर्व सदस्यांनी मंजूर केला.