अजित पवारांनी मंत्रालयात पाऊल टाकताच सिंचन घोटाळ्यातील फाईल बंद, म्हणजे… : खडसे
जळगाव : अजित पवार उपमुख्यमंत्री होणं, त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकणं आणि बातमी येणं की सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची फाईल बंद, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, अशी शंका का घेता? हा योगायोग आहे, अशा कानपिचक्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी लगावल्या. जळगावमधील एका कार्यक्रमात खडसे बोलत होते.
‘देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचा पहिला दिवस. त्यांनी चार्ज घेणं, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होणं, त्यांनी मंत्रालयात पाऊल टाकणं आणि बातमी येणं की सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांची फाईल बंद, हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला नाही, अशी शंका का घेता? हा योगायोग आहे’, अशी उपहासात्मक टीका एकनाथ खडसे यांनी केली. खडसेंनी स्वपक्षाला घरचा आहेर देण्याची एकही संधी गेल्या काही दिवसात सोडलेली नाही.
‘ती फाईल बंद आधीच करायची होती. आता याला योगायोग म्हणायचा? की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून ती बंद करण्यात आली, असं सांगायचं? की अजितदादा सरकारमध्ये आले म्हणून बंद केली, असं सांगायचं? ही जी शंका आहे जनसामान्यांमध्ये, त्यामुळे साहजिकच त्यांचा राजकारणावरचा विश्वास उडाला आहे’, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.