अखेर ‘त्या’ शहिदांच्या नातेवाईकांना सवलती
- २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान
काळबादेवीतील गोकुळ हाऊस इमारत दुर्घटनेत कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडलेले प्रमुख अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सुधीर गोपाळ अमीन, साहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी संजय राणे आणि केंद्र अधिकारी महेंद्र देसाई यांना राज्य सरकारने शहिदांचा दर्जा दिल्यानंतर तीन वर्षांनी त्यांच्या नातेवाईकांना सवलती देण्याची आठवण पालिका प्रशासनाला झाली आहे. या सवलतीनुसार शहिदांच्या नातेवाईकांना सदनिका, ठेव स्वरूपात २५ लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि दोन अपत्यांचा देशांतर्गत शाळा-महाविद्यालयीन खर्च देण्यात येणार आहे.
काळबादेवीच्या हनुमान गल्लीतील गोकुळ निवास इमारतीला ९ मे २०१५ रोजी दुपारी ४.१५ च्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला आणि या ढिगाऱ्याखाली नेसरीकर, अमीन, राणे आणि देसाई अडकले. ढिगारा उपसून त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
या चौघांना शहिदांचा दर्जा द्यावा, अशी मागणी करणारा ठराव पालिका सभागृहात २९ जून २०१५ रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजूर केला. हा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. राज्य सरकारने २२ जुलै २०१६ रोजी शासन निर्णय जारी करीत या चौघांनाही शहिदांचा दर्जा दिला. तसेच शहिदांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा नातेवाईकांना देण्यास मंजुरीही दिली.