अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू
औरंगाबाद |महाईन्यूज|
१०, ११ आणि १२ जानेवारी असे तीन दिवस फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद येथे होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका शुक्रवारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते होत आहे. समारोप ज्येष्ठ कथा – कादंबरीकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
याशिवाय ज्येष्ठ व श्रेष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव, दिल्ली येथे चहा विकून चरितार्थ चालवणारे मूळ अमरावती जिल्ह्यातील मान्यवर मराठी भाषक हिंदी साहित्यिक लक्ष्मणराव (चहावाले) आणि श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाच्या प्रकाशक सुमती लांडे यांचा त्यांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल संमेलनात जाहीर सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील कवींचे ‘आमचे कवी : आमची कविता’ असे एक स्वतंत्र कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनस्थळ मांडवासमोर रसिक – वाचकांसाठी भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित केले असून पुस्तके खरेदी – विक्रीची उत्तम सोय करण्यात आलेली आहे.
प्रदर्शनाच्या मध्यभागी पुस्तक प्रकाशनाची खास सोय करण्यात आली आहे. संमेलनात कार्यक्रमांसाठी एक भव्य मंडप उभारण्यात आला असून त्यात सात हजार रसिकांची बसण्याची सोय केली जाणार आहे. याशिवाय आणखी एक मध्यम आकाराचा आणि कवी कट्ट्यासाठी एक लहान आकाराचा अशा दोन मंडपांतही एकाच वेळी तीन कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संमेलनस्थळाला ‘संत गोरोबा काकानगरी’ असे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमांसाठी उभारलेल्या मंडपांना उस्मानाबाद जिल्ह्यातील सुपुत्र शाहीर अमर शेख, सेतुमाधवराव पगडी आणि दत्तो अप्पाजी तुळजापूरकर अशी नावे देण्यात आलेली आहेत. तरी रसिकांनी संमेलनाला येण्याचेव कार्यक्रमांचा व पुस्तके खरेदीचा आनंद घेण्याचे आवाहन ठाले पाटील आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी तमाम मराठीप्रेमी व वाङ्मयप्रेमी रसिकांना केले आहे.
पाच परिसंवाद, दोन कविसंमेलने, बालमेळावा
संमेलनात वाङ्मयीन व सामाजिक प्रश्नांवर पाच परिसंवाद, प्रतिभा रानडे यांची प्रकट मुलाखत, निमंत्रित कवींची दोन कविसंमेलने, कथाकथन, महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या ग्रंथावर अभ्यासकांची परिचर्चा तसेच आजच्या पाच लक्षवेधी कथाकारांशी अरविंद जगताप व राम जगताप यांचा प्रकट संवाद, बालसाहित्यिकांचा मुलांशी संवाद साधणारा ‘बालमेळावा’, बालाजी सुतार यांच्या ‘गावकथा’ या नाटकाचा प्रयोग आणि दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आखले आहेत, असे ठाले पाटील म्हणाले.