अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत, ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई : कोरोना संकटच्या काळात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे.
विद्यापीठांनी ठरवलेल्या सुत्रानुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना पदवी दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करत असल्याची माहिती ठाकरे सरकारने पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे दिली आहे. यासाठी मोदींनी संबंधित अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असे आवाहन ठाकरे सरकारकडून करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवलेल्या सुत्रानुसार पदवी देण्यात येईल.
या आदेशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परीक्षा स्थगित करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात पत्रात मुख्यमंत्र्यांनी भारत सरकारकडून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला डिसेंबर २०२० पर्यंत परीक्षा स्थगित करण्याची विनंती केली, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले, “अंतिम वर्षातील एमडी एमएसचे अनेक विद्यार्थी निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका दवाखाने तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड -१९ रुग्णांवर उपचारासाठी तसेच क्लिनिकल व्यवस्थापनास मदत करण्यात आघाडीवर आहेत. जर त्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या तर या अत्यंत महत्त्वाच्या काळात प्रशिक्षित डॉक्टरांची कमतरता भासेल.”