सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली – बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशातील सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दोन दिवस संप पुकारला होता. अर्थसंकल्पात आयडीबीआयसह दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा सीतारामन यांनी केली होती. याच्याविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
वाचा :-भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दिलीप गांधींचे निधन
बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले असून, सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण केले जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, खासगीकरण होत असलेल्या बँकांमधील कर्मचारी व ठेवीदारांचे हित जपले जाईल, असेही त्या म्हणाल्या.
बँकांच्या खासगीकरणाबाबत अर्थमंत्री म्हणाल्या की, काही बँका चांगली कामगिरी करत आहेत तर काही बँकांची कामगिरी सामान्य आहे. मात्र काही बँका संकटग्रस्त असून ग्राहकांना सेवा देण्यास सक्षम नाहीत. अशा वेळी ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा देण्यास बँक सक्षम असावी हा सरकारचा हेतू आहे. त्यातून बँकांचे एकत्रीकरण देखील करण्यात आले. ज्यातून मोठ्या ग्राहकांच्या गरजा त्या बँका पूर्ण करू शकतील.
सर्वच सरकारी बँकांचे खासगीकरण होणार नाही. ज्या बँका सध्या निधी उभारण्यास आणि व्यवसाय करण्यास संघर्ष करत आहेत, अशा बँकांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.देशाच्या आर्थिक विकासाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोठ्या बँकांची गरज असून खासगीकरणाचे धोरण विचारपूर्वक राबवले जात असल्याचेही सीतारमन म्हणाल्या.