शहरातील विविध स्मारक व नामफलक दुर्लक्षित
![Various monuments and plaques in the city are neglected](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/43e9e856-52e3-4c91-8962-1e515f9bba45-780x470.jpg)
शहरातील साहित्यिक, क्रांतिकारक किंवा मान्यवर व्यक्तींची स्मृती कायम राहावी या उद्देशाने त्यांचे निवासस्थान परिसरातील स्मृतिस्थळाकडे किंवा ज्यांच्या स्मृतीनिमित्त वेगवेगळ्या मार्गाला नावे देण्यात आली आहेत, अशा मार्गावरील फलकाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही वर्षात शहरात विविध क्रांतिकारकांचे पुतळे, शहीद स्मारक आणि साहित्यिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या स्मृतीनिमित्त स्मारके निर्माण करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मार्गाचे नामकरण करत त्यांच्या नावाने फलक लावले आहे. मात्र, आज त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. रामदासपेठ परिसरात नागपूरचे भूषण राहिलेले सुंदरलाल राय यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याला त्यांचे नाव देत फलक लावण्यात आला होता. मात्र, आज हा फलक भंगलेल्या अवस्थेत दिसत आहे. तुळशीबागेतील सी. पी. अँड बेरार महाविद्यालय समोरील चौकाला विदर्भाचे भूषण असलेले आणि मराठी काव्यप्रांतात अग्रणी असलेले कविवर्य, कविश्रेष्ठ राजा बढे चौक, असे नामकरण करण्यात आले होते.
स्मृती स्तंभावरील मजकूर चुकीच्या पद्धतीने लिहिला असल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, तेथील स्मृती स्तंभ अजुनही बदलला नाही. या स्मारकाच्या बाजूला कचरा असतो. शहरातील अनेक भागातील स्मृतिस्थळाची किंवा नामफलकाची अवस्था फारच वाईट आहे मात्र, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महापालिका प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी धरमपेठ भागात ज्येष्ठ साहित्यिक अ.ना. देशपांडे यांच्या स्मृती निमित्त लावण्यात आलेला नामफलक तुटलेला स्थितीत होती.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार केल्यानंतर तो नव्याने लावण्यात आला आहे. शहरातील विविध मार्गांचे मान्यवरांच्या स्मृतीनिमित्त नामकरण केले जाते. मात्र, नामकरण केलेल्या फलकाकडे प्रशासनाचे लक्ष राहत नाही. अनेक फलक सिमेंट रस्त्यांची कामे आणि रस्ता रुंदीकरणात गायब झाले आहे.
शुक्रवार तलावाजवळील हुतात्मा स्मारक, गोवारी स्मारक, संत्राबाजारजवळील शहीद स्मारक या ठिकाणी सुद्धा अस्वच्छता दिसून येते. शहरातील उद्यानातील स्मारकांची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी सुद्धा तीच अवस्था आहे. शहरातील विविध भागातील चौक सैौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने अभियान राबवले होते. परंतु आजही अनेक भागातील पुतळ्याच्या अवतीभोवती तयार करण्यात आलेले लोंखडी कुंपण तुटलेल्या अवस्थेत असून त्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष नाही. महापुरुषांच्या केवळ जयंती आणि पुण्यातिथीला स्वच्छता मोहीम राबवली जात असताना वर्षभर मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
शहरातील विविध भागातील मान्यवरांच्या नामकरण करण्यात आलेल्या फलकाची दुरुस्ती केली जात असून ते नव्याने लावले जात आहे. नागरिकांनी याबाबत लक्षात आणून दिले तर त्यावर तत्काळ कार्यवाही होईल. शिवाय ज्या ठिकाणी विविध स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक आहे तिथे सौैंदर्यीकरण करण्यात आले आहे, असे महापालिकेचे अतिरक्त राम जोशी म्हणाले.