आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू, कसा आहे प्लान?
जालना – आजपासून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर देशभर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात लसींचा साठा अपुरा असल्याने मोजक्याच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असून आज केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचंच लसीकरण होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यानुसार आज ४५ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार नाही. मुंबईत केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण केले जाईल. तर पुण्यात 20 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. कोरोना लसीकरण अविरत सुरु ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला तात्काळ लसींचा पुरवठा करावा, असे टोपे यांनी सांगितल
कोरोना लसीकरणाची योजना?
◆ प्रत्येक जिल्ह्यात पाच ठिकाणी सेशन घेण्यात येणार
◆मोठ्या जिल्ह्यांना 20 हजार लसी दिल्या आहेत, मध्यम शहरांना साडेतीन हजार लसी, छोट्या शहरांना 5 हजार लसी
◆ 7 दिवस पुरेल असे नियोजन जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने करावे.
◆ लसीच्या मर्यादेमुळे लसीकरणाची गती जाणीवपूर्वक कमी करावी लागेल.
◆ आज दिवसभरात प्रातिनिधीक स्वरूपात लसीकरणाला सुरुवात आणि हे लसीकरण 7 दिवस चालणार आहे
◆ लसीकरण न थांबता चालु रहावे म्हणून प्रयत्न करणार
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी स्वीकारण्यास राज्य शासन तयार असून यासाठी लागणारी सर्व रक्कम एका चेकद्वारे देऊन लस विकत घेण्याचीही शासनाची तयारी आहे परंतू लसीची उपलब्धता ही मर्यादित असल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लगेच उद्यापासून लस केंद्रांवर गर्दी करू नये, कोविन ॲपवर नोंदणी केल्यानंतर जी तारीख आणि वेळ मिळेल त्या दिवशी जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांनी राज्याची लसीकरणाची क्षमता रोज १० लाख एवढी असली तरी या वयोगटासाठी फक्त ३ लाख डोस राज्याला मिळाल्याची माहितीही दिली. मुख्यमंत्र्यांनी काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने वाढणारी रुग्णसंख्या थोपवण्यासाठी कडक निर्बंधाची आवश्यकता असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून राज्य शासनास सहकार्य करण्याचे आवाहन ही केले. तसेच येऊ शकणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जीवाचे बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी अभिवादन केले.
उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास प्रारंभ होणार आहे. राज्य शासनानेही लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात या वयोगटात ६ कोटी नागरिक आहेत त्यांना प्रत्येकी २ डोस म्हटले तरी १२ कोटी लसीची आवश्यकता आहे. आपण दररोज १० लाख लोकांचे लसीकरण करू शकतो एवढी महाराष्ट्रात क्षमता आहे परंतू लस वितरण हे ऑक्सीजन आणि रेमडेसीवीर प्रमाणे केंद्र शासनाच्या अखत्यारितील विषय आहे. राज्याला उपलब्ध होणारी लस ही मर्यादित आहे. त्यामुळे थेट लस केंद्रावर जाऊन गर्दी करू नये, लस केंद्रे ही कोविड प्रसाराची केंद्रे होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. राज्याला जस जशी लस उपलब्ध होईल तस तशी सर्व नागरिकांना लस देण्याची सुनियोजित व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले.
राज्यांचे स्वतंत्र ॲप असावे
लसीची नोंदणी करण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने कोविन ॲप काल क्रॅश झाल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की याचसाठी आपण पंतप्रधानांकडे पत्राद्वारे प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्याची व ते कोविन ॲपला जोडण्याची किंवा राज्यांना त्यांचे ॲप तयार करू देऊन ते कोविन ॲपला जोडण्याची मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे.