देशात टोमॅटो ३०० रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता?
![Tomatoes are likely to go up to Rs 300 per kg in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Tomatoes--780x470.jpg)
नवी दिल्ली : संपुर्ण भारतात टोमॅटोच्या किंमती गगनालाच भिडलेल्या आहेत. येत्या काही दिवसांत दिल्लीत टोमॅटोचे भाव अणखी भडकणार आहेत. २ ऑगस्ट रोजी दिल्लीत टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत २०३ रूपये आहे, पण गेल्या काही दिवसांत त्याची किंमत २५० रूपये प्रति किलोपेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे अधिकृत वेबसाइटनुसार, देशातील सर्वांत महाग टोमॅटो पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये २६३ रूपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.
महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात वाढ होत असताना येत्या काही दिवसांत तो ३०० रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न विपणन समिती अर्थात एपीएमसीचे सदस्य अशोक कौशिक यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव १६० रुपये किलोवरून २२० रुपये किलो झाला आहे, त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वाढू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. टोमॅटो, शिमला मिरची आणि इतर हंगामी भाज्यांच्या विक्रीत मोठी घट झाल्याने भाज्यांच्या घाऊक विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. प्रमुख उत्पादक प्रदेशात अतिवृष्टीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे टोमॅटोचे भाव एक महिन्याहून अधिक काळ वाढत आहेत.
हेही वाचा – केंद्र सरकारची मोठी घोषणा, देशात लॅपटॉप, टॅबलेट व पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध
आझादपूर भाजी मंडईचे घाऊक व्यापारी संजय भगत म्हणाले की, हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची वाहतूक करताना अनेक अडचणी येत आहेत. उत्पादकांकडून भाजीपाला आणण्यासाठी नेहमीपेक्षा सहा ते आठ तास जास्त लागत आहेत. अशा स्थितीत टोमॅटोचा भाव किलोमागे ३०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. ते म्हणाले की, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटो आणि इतर भाज्यांचा दर्जा घसरला आहे. हिमाचल प्रदेशात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.