“आजचे निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणारे”; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : ज्याप्रमाणे रथ एकाच चाकाने पुढे जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे केवळ नशिबावर अवलंबून राहून यश मिळवता येत नाही. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि दृढनिश्चयाचे महत्त्व अधोरेखित करून, सर्वांनी या सामायिक लक्ष्यासाठी दररोज आणि प्रत्येक क्षणी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. आज आपण ज्या धोरणांवर काम करत आहोत, जे निर्णय घेत आहोत, ते पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणारे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १७ व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे नागरी सेवकांना संबोधित केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, प्रधान सचिव शक्तिकांत दास, कॅबिनेट सचिव टी. व्ही. सोमनाथन, सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आदी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी लोक प्रशासनातील उत्कृष्टतेसाठीचे १६ नागरी सेवकांना पंतप्रधान पुरस्कारदेखील प्रदान केले. यावेळी त्यांनी नागरी सेवा दिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन करून संविधानाचे ७५ वे वर्ष आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती असल्याने या वर्षीच्या उत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान मोदी यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे पालन करणारी आणि अत्यंत समर्पणाने देशाची सेवा करणारी सनदी सेवेच्या दृष्टिकोनावर भर दिला.
हेही वाचा – पिंपरी महापालिकेला १० लाखांचे पारितोषिक
आपल्या भाषणामध्ये त्यांनी विविध गोष्टींचा उल्लेख केला. यामध्ये स्वच्छ ऊर्जा, क्रीडाक्षेत्रात प्रगती, अंतराळ क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी यांसारखी भारताची महत्वाकांक्षी उद्दिष्टे अधोरेखित केली. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांवर असलेली प्रचंड मोठी जबाबदारी अधोरेखित करुन हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणताही विलंब टाळण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आतापर्यंत साधलेली यशस्वी उद्दिष्टे ही केवळ एक सुरुवात आहे आणि यापुढे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रगती साधणे हे आपले ध्येय असले पाहिजे. त्यासाठी नव्या उंचीचे मानदंड निश्चित करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या जगातही मानवी निर्णयशक्तीचे महत्त्व कमी होऊ नये. नागरी सेवकांनी संवेदनशील राहून, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांचा आवाज ऐकावा, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
नागरिक देवो भवः हे तत्त्व अतिथी देवो भवः या भारतीय संस्कृतीतील संकल्पनेच्या अनुषंगानेच आहे. नागरी सेवकांनी स्वतःकडे केवळ प्रशासक म्हणून न पाहता, विकसित भारत घडवणारे शिल्पकार म्हणून पाहणे आवश्यक आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी