नववर्षात राज्यसभेच्या ‘एवढ्या’ जागा होणार रिक्त; एनडीएसह विरोधकांची लागणार कसोटी

नवी दिल्ली : 2026 मध्ये राज्यसभेच्या तब्बल ७२ जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकांचा थेट परिणाम केंद्रातील राजकारणावर, सत्ताधारी एनडीएची ताकद आणि विरोधकांची रणनीती यावर होणार आहे. सध्या राज्यांच्या विधानसभांची स्थिती पाहता, भाजप आणि एनडीएची राज्यसभेतील संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे, तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या अडचणी वाढू शकतात.
राज्यसभेतील बहुमताचे गणित बदलणार असले, तरी एनडीए आपली पकड अधिक मजबूत करणार आहे. सरकारविरोधात दबाव निर्माण करण्याची विरोधकांची ताकद काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यसभेत भाजपचे १०३ खासदार, तर एनडीएचे १२६ खासदार आहेत. २०२६ मध्ये भाजपच्या ३० खासदारांचा कार्यकाळ संपणार असला, तरी किमान ३२ नवीन खासदार भाजपचे निवडून येणे जवळपास निश्चित मानले जात आहे. याशिवाय, जागावाटप आणि राजकीय समीकरणांमुळे भाजप आणखी २-३ जागा जिंकू शकतो.
हेही वाचा – भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा मुहूर्त ठरला; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केली तारीख
एनडीएतील मित्र पक्षांचेही प्रतिनिधित्व वाढण्याची शक्यता आहे. तेलुगु देशम पार्टी, जनसेना, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना प्रत्येकी एक जागा अधिक मिळू शकते. काही जागा कमी झाल्या तरी एकूणात एनडीए चांगल्या स्थितीत राहणार आहे. २०२६ मध्ये सर्वाधिक म्हणजे १० जागा उत्तर प्रदेशातून कमी होणार आहेत. या जागांपैकी बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या गणितानुसार, भाजप ७ ते ८ जागा जिंकू शकतो, तर समाजवादी पक्षाला २ जागा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तमिळनाडू अशा अनेक राज्यांमध्येही जागा रिक्त होणार आहेत. बहुतांश ठिकाणी सत्ताधारी पक्षांना फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषत: गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांत भाजप चांगल्या स्थितीत, तर काही राज्यांत काँग्रेसला मर्यादित यश मिळू शकते. महाराष्ट्रात सात जागा रिक्त होणार असून येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचे राजकारण रंगणार आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला बहुतेक जागा मिळतील, मात्र भाजप एक जागा जिंकू शकतो.




