वाघाने केली चक्क वनखात्याची तिजोरी रिकामी…
![The tiger emptied the treasury of the forest account.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/tiger-nag-780x470.jpg)
तुम्ही आमच्या घरात आलात ना, मग आम्ही जायचे कुठे? आता आम्हीही तुमच्या घरात येणार. जंगलातल्या वाघाची अधिवासासाठी चाललेली ही लढाई आणि त्यातून मग माणसासोबत झालेल्या संघर्षाचा उडालेला भडका आजतागायत शांत झालेला नाही. याउलट तो वाढतच गेला. यात कधी वाघांचा बळी गेला, तर माणसांना मारले म्हणून त्याला कायमचे गजाआड व्हावे लागले. मात्र, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या वनखात्यानेच त्याला पिंजऱ्यात टाकले म्हणून त्यानेही खात्याला सोडले नाही. खात्याची तिजोरी त्याने कोट्यावधी रुपयाने रिकामी केली.
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात माणसांचा बळी जात आहे. मात्र, त्याचवेळी यातील ९० टक्के हल्ले हे माणसांच्या जंगलातील घुसखोरीमुळे होत आहेत. गेल्या चार वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २९८ माणसे मारली गेली. त्यातील १८२ बळी हे वाघाने घेतले आहेत. गेल्या चार वर्षात हा आकडा वाढतच चालला आहे. २०१९ मध्ये २४, २०२० मध्ये ३९, २०२१ मध्ये ५४ तर २०२२ मध्ये ६५ माणसांचा बळी वाघाने घेतला आहे. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या मानव व पशूधन हानीसाठी नुकसान भरपाई म्हणून खात्याच्या तिजोरीतून गेल्या चार वर्षात ३५६.६४ कोटी रुपये देण्यात आले आहेत.