देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ
नवी दिल्ली – देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. देशात काल दिवसभरात तब्बल 1,31,968 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 780 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,30,60,542 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,67,642 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 61,899 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 1,19,13,292 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या 9,79,608 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
मागील वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. तर आज तब्बल 1,31,968 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अतिशय आवश्यक आहे.
दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.