खडकेवाके गावातील डोलणारे उसाचे मळे भुईसपाट
अतिवृष्टीने बळीराजाच्या स्वप्नांचा चक्काचूर

शिर्डी : जेथे उन्हाळ्यात गवताची काडी नजरेस पडत नव्हती. टँकरचे पाणी प्यावे लागायचे. त्या खडकेवाके गावात निळवंडे धरणाचे पाणी आले. कोरडवाहू शेतकरी ऊस बागायतदार झाले. त्याला निसर्गाची दृष्ट लागली. कालच्या अतिवृष्टीने या शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. पावसासोबत वादळी वाऱ्याने केवळ उसाचे फड नव्हे, तर या ऊस बागायदार होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे नशीब भुईसपाट झाले. काल परवापर्यंत डौलाने डोलणारे उसाचे मळे आता जमिनीवर लोळण घेत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.
अडीच हजार लोकसंख्येच्या गावाची कष्टाळू म्हणून ओळख. दररोज १२ ते १५ हजार लिटर दुधाचे उत्पादन येथील ग्रामस्थ करतात. निळवंडेच्या पाण्यामुळे मागील वर्षापासून येथे उसाची लागवड सुरू झाली. एकरी उत्पादन सत्तर टनांपर्यंत गेले. यंदाही उसाचे पीक जोमाने वाढत होते. ५० एकरांहून अधिक क्षेत्रात लागवड झाली होती. हिरवेगार वैभव परवाच्या पावसाने जमिनदोस्त केले. साखर कारखाने सुरू व्हायला आणखी एक महिना अवकाश आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
भुई धरलेल्या या फडांना तोपर्यंत उंदरांचा उपद्रव सुरू होईल. जमीन ओली असल्याने उसाच्या पेऱ्यांवर मुळे फुटतील. ही मुळे जमिनीत गेली, तर तोडणी अशक्य होईल. पीक कोवळे असल्याने त्यात पुरेशी साखर नाही. त्यामुळे कारखाने सुरू झाले, तरीही लगेचच तोडणी होणार नाही. जमीन ओली, रस्ते खराब झाले, त्यामुळे पुढील महिनाभरात साखर कारखाने सुरू होण्याची सुतराम शक्यता नाही. बेण्यासाठी उसाचा उपयोग करावा, तर त्याला मर्यादा आल्या आहेत. मोठा खर्च करून हे फड उभे केले. आता, त्यांचे नेमके काय होणार याचे उत्तर शेतकऱ्यांना सापडत नाही.
उसाच्या पिकाचे अतिवृष्टीने एरवी फारसे नुकसान होत नाही. मात्र, वादळी वाऱ्यामुळे फड भुईसपाट झाले. त्यावर धो-धो पाऊस कोसळला. त्याचा परिणाम म्हणून या फडांना मुळे फुटण्याचा धोका निर्माण झाला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने उसाचे मळे पिकविले. ऊस परिपक्व झालेला नसतानाच हे फड भुईसपाट झाले. फार मोठे नुकसान झाले आहे. झालेले नुकसान शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. खरे तर अशा विचित्र परिस्थितीत ऊस, द्राक्ष, फळबागा, लसूण घास या सारख्या बारमाही पिकांना निकष बदलून तातडीने भरपाई देण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे; अन्यथा शेतकरी देशोधडीला लागतील.
-सचिन मुरादे, माजी सरपंच, खडकेवाके