रेल्वे भरती परीक्षेत घोटाळा?; संतप्त विद्यार्थ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, रेल्वे सेवेला फटका
![Railway recruitment test scam ?; Angry students throw stones at police, hit railway service](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/exam_students_protest.jpg)
बिहार | टीम ऑनलाइन
आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालावरून बिहारमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमधील अनेक रेल्वे स्थानकांवर दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. सीतामढी रेल्वे स्टेशनवर आंदोलन करणाऱ्यांना विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
रेल्वे मंत्रालयातील रिक्त पदासाठी घेण्यात आलेल्या आरआरबी एनटीपीसी परीक्षेच्या निकालात घोटाळ्या कऱण्यात आल्याचा आरोप बिहारमधील विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी बिहारमधील विविध रेल्वे स्थानकांवर आंदोलनही सुरू केलं आहे.
दरम्यान, गुमटीमध्ये आंदोलनच्या दुसऱ्या दिवशी अनुचित प्रकार घडला. आंदोलक विद्यार्थ्यांच्या आंदोलनमुळे रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करत वाहतूक रोखली. त्यामुळे रेल्वे सेवेबरोबर रस्ते वाहतुकही ठप्प झाली.
आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांबरोबरच मेहसोल ओपी आणि नगर पोलीस ठाण्यातील पोलिसही आंदोलन स्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. आंदोलन विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे बिहारमध्ये ठिकाणी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. दानापूर विभागातील फतुहा आणि बक्सर रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांनी दिली.
रेल्वे मंत्रालयाकडून खुलासा
विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. दुसऱ्या टप्प्यातील सीबीटीसाठीच्या उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची अधिसूचना २८ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रकाशित करण्यात आलेली आहे. यात १३ वर्गातील जाहिरात देण्यात आली होती, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
प्रकरण नेमकं काय?
आरआरबीने १३ जागांसाठी परीक्षा घेतली होती. रेल्वे भरती मंडळाकडून नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी भरती अर्थात सीबीटी-१ परीक्षेचा निकाल १४ व १५ जानेवारी २०२२ रोजी घोषित केला. एक कोटीपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे सीबीटी-२ म्हणजेच दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड करणं अपेक्षित होतं. यावरून विद्यार्थ्यांकडून परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे.