शेती, पूरक व्यवसायवाढीला नागपूर ‘आयआयएम’चे बळ; विद्यार्थ्यांसाठी ‘प्रोफेशनल मॅनेजमेंट प्रोग्राम’
नागपूर : भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरच्या (आयआयएम) भव्यदिव्य शैक्षणिक परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाची ओळख व्हावी, त्यांच्या ज्ञानाचा येथील शेती आणि पूरक व्यवसायासाठी लाभ व्हावा या उद्देशाने ‘आयआयएम’मधील विद्यार्थी परिसरातील ग्रामीण, दुर्गम भागात जाऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहेत. यासाठी ‘आयआयएम’ने विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी ‘प्रोफेशनल मॅनेजमेंट प्रोग्राम’ (पीएमपी) सुरू केला आहे. हा प्रकल्प देशातील पहिलाच आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना ग्रामीण आणि दुर्गम भागात दोन दिवस वास्तव्य करावे लागेल. या दरम्यान विद्यार्थी तेथील परिस्थितीचा अभ्यास करतील. तेथील समस्या जाणून घेतील आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी संभावित उपाययोजनांबाबत सविस्तर अहवाल तयार करतील. याशिवाय तेथील नागरिकांचे शेती आणि पूरक व्यवसायाचे उत्पन्न कशाप्रकारे वाढवता येईल, याबाबत देखील आयआयएमचे विद्यार्थी मार्गदर्शन आणि मदतही करणार आहेत. येथील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाते. मात्र, केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर प्रात्यक्षिकही अनुभव यावा यासाठी हा प्रयोग सुरू करण्यात आल्याचे आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी सांगितले.
ग्रामीण भागाची ओळख आवश्यक
विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वागीण विकास करायचा असेल तर भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागांची ओळख असणे आवश्यक आहे. आजही ७० टक्के जनता ही खेडय़ांमध्ये राहते. तेथील जनतेचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पूरक जोडधंदे आहेत. त्यामुळे ‘आयआयएम’मधील विद्यार्थी भविष्यात जागतिक दर्जाच्या संस्थांमध्ये नोकरी करणार असले तरी त्यांना ग्रामीण भागाची ओळख असणे आवश्यक आहे. यामुळे कुठलाही निर्णय घेताना ते चहुबाजूंनी विचार करू शकतील. या उद्देशानेच हा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याने डॉ. मैत्री यांनी सांगितले.
‘आयआयएम’ नागपूर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणार नाही तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेलाही कसा होईल, या उद्देशाने ‘पीएमपी’ कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याचा निश्चित लाभ होईल हा विश्वास आहे.
-डॉ. भीमराया मैत्री, संचालक, आयआयएम, नागपूर.