Mahashivratri : भगवान शंकर महादेव यांच्या अद्भूत शक्तीशाली पैलुंचे रहस्य !
महाईन्यूज | अमोल शित्रे
अखंड ब्रह्मांडाचे विधाता, देवाधीदेव, आदीदेव, महादेव शंकर यांच्या दैवीशक्तीचे रहस्य आजच्या अधुनिक काळात देखील उलघडलेले नाही. महादेव हे ब्रह्मांडातील शक्तीशाली देव मानले जातात. हे सर्वज्ञात असले तरी त्यांच्या अद्भूत शक्तीशाली पैलुंचे रहस्य जाणून घेण्याजोगे आहे. ”महाशिवरात्री”च्या पूर्वसंध्येला ”महाईन्यूज”च्या माध्यमातून भगवान शंकर महादेव यांच्या शक्तीशाली व्यक्तीत्वाचा घेतलेला हा अभ्यासपूर्ण आढावा.
भगवान शंकर महादेवांच्या जटाधारी रुपाकडे पाहिल्यानंतर तेथे गंगा निवास करताना दिसते. गंगा म्हणजेच पाणी आणि पाण्याचा शंकर महादेव यांच्याशी असलेला संबंध यातून अधोरेखीत होतो. डोक्यावरील जटांमधून थोडे खाली आल्यानंतर कपाळी तिसरा डोळा दिसतो. आणि त्यामध्ये आग दिसते. पाणी आणि आगीचं विभिन्न नातं असताना याठिकाणी मात्र हे दोन्ही एकत्र दिसतात. याहून आणखीन एक अद्भूत प्रकार म्हणजे महादेवांच्या जटांमध्ये चंद्र दिसतो. चंद्रामध्ये अमृत असल्याची अख्यायिका आहे. थोडंसं खाली आल्यानंतर गळ्यात विष ही दिसतं. अमृत आणि विष दोन्ही पचवण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचं दिसतं. अमृत आणि विष दोन्ही वेगवेगळी दृव्य आहेत. दोन्ही दृव्य एकत्र असूच शकत नाहीत. परंतु, महादेव यांच्याजवळ ही दोन्ही दृव्ये दिसतात.
महादेवांच्या गळ्यात पाहिलं तर सापाचं ही दर्शन होतं. साप जवळ असताना थोडंसं निरखून पाहिलं तर उंदीर देखील महादेवांच्या जवळ पहायला मिळतो. उंदीर हे शंकर महादेव यांचे पुत्र गणेशाचे वाहन मानले जाते. दोन्ही सरपटणारे प्राणी एकमेकांचे कट्टर विरोधक असताना महादेवांनी या दोन्ही प्राण्यांना एकत्र आणले आहे. तसेच, महादेव यांचा अन्य एक पुत्र कार्तिकेय यांचं वाहन मोर आहे. मोर सुध्दा महादेवांच्या जवळ दिसतो. गळ्यात साप असताना खाली मोराचे देखील तेवढेच महत्व अधोरेखीत होते. नैसर्गिकदृष्ट्या मोर आणि साप हे एकत्र येऊच शकत नाही. याहून विशेष बाब म्हणजे महादेवांचे वाहन बैल आहे. तर, पार्वती मातेचं वाहन हे वाघ आहे. वाघ आणि बैल एकत्र येऊ शकत नाही. तरी देखील महादेव आणि पार्वती यांचे ते वाहन आपल्याला पाहायला मिळतात.
क्रोध आणि महादेव यांच्यात मोठी दरी
भगवान महादेव हे तपश्चर्या करताना सर्वांगाला विभूती भस्म लावतात. तर, त्यांच्यासोबत आपापसात लढणारे प्राणी निवास करतात. पृथ्वीतलावरील हा मोठा विरोधाभास असताना हे सर्व भगवान महादेवांच्या सानिध्यात वास्तव्य करतात. त्यांच्यात आपापसात टोकाचा विरोधाभास असला तरी भगवान महादेव हे कधी क्रोधीत झाल्याचे दिसत नाहीत. एकदम आनंदात आणि शांततेत भगवान शंकर महादेव आपल्याला पहायला मिळतात. सांगण्याचं कारण एवढंच की, आयुष्यात कितीही संकटं आली तर केवळ महादेव यांच्याकडे पाहून आपण संकटांवर मात केली तरी सार्थक होईल, असा संदेश भगवान महादेवांच्या लोकप्रिय प्रतिमेतून मिळतो.