भारतीय लष्कराकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा
![Big success for security forces in Srinagar; Elimination of terrorists in the encounter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/terrorist-4.jpg)
राजौरी – पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्थान घातले आहे. भारतीय लष्कराने ही कारवाई राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये केली.
दरम्यान, जंगलामधून हे दहशतवादी दोन दोनच्या गटाने हल्ला करत असल्यामुळे भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाले होते. त्यांनतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. त्यांनी यावेळी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील, तेव्हा उत्तर द्यावे असा सल्ला स्थानिक कमांडर्सला देण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यानुसार, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या ९ ते १० दहशतवाद्यांनी मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केल्याची माहिती दिल्लीमधील साऊथ ब्लॉकने दिली. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला. पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर अधिक जोर आला असल्यामुळे या भागांमध्ये भारताने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली आहे.